छगन भुजबळांच्या प्रयत्नांतून नगरसूल रेल्वेस्थानकावर साकारणार कव्हर्ड गुड्स शेड

शेतकऱ्यांच्या खतांना मिळणार बिगरमोसमी पावसापासून संरक्षण, खतांच्या साठवणुकीसाठी सुरक्षित सुविधा

येवला, १२ जून: नगरसूल रेल्वेस्थानकावर कव्हर्ड गुड्स शेडच्या बांधकामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथे येणाऱ्या खतांच्या आवकीला सुरक्षितता मिळेल तसेच शेतकऱ्यांच्या मालाची साठवणुकीसाठीही योग्य सुविधा उपलब्ध होईल. ही मंजुरी मिळवून देण्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांनी यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून शेतकऱ्यांच्या हिताची मागणी मांडली होती.

नगरसूल हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. येथून दक्षिण भारतात जाणाऱ्या अनेक गाड्या सुटतात. मात्र, येथे कव्हर्ड गुड्स शेडची सुविधा नसल्यामुळे बिगरमोसमी पावसामध्ये खते आणि शेतमालाला नुकसान होत होते. याचा परिणाम म्हणून खत कंपन्या येथे खते उतरविण्यास कचरत होत्या आणि शेतकऱ्यांना वाढीव खर्चासह खते मिळत होती.

या समस्येच्या निराकरणासाठी छगन भुजबळ यांनी २३ ऑगस्ट २०२४ रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे सरव्युवस्थापक अरुणकुमार जैन यांच्याकडे पत्र लिहून नगरसूल स्थानकावर कव्हर्ड गुड्स शेडची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाची पाहणी केली आणि अलीकडेच या कामाला मंजुरी दिली. दक्षिण मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक प्रदीप कामले यांनी नगरसूल स्थानकाला भेट देऊन या शेडसाठी निवडलेली जागा तपासली. आता लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

कव्हर्ड गुड्स शेडमुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचा होणार पुढील फायदा:

👉 अचानक येणाऱ्या बिगरमोसमी पावसापासून रेल्वेस्थानकावरील खाते व शेतमालाचे संरक्षण
👉 उघड्यावर खते, बी-बियाणे, शेती उपकरणे ठेवण्यामुळे पावसाने होणारे नुकसान टळणार.
👉 कव्हर्ड शेडमुळे माल ओलाव्यापासून सुरक्षित राहणार.
👉 शेतकऱ्यांना खत, धान्य, उत्पादित शेतमाल काही काळासाठी सुरक्षित ठेवता येणार.
👉 बाजारभाव वाढेपर्यंत माल ठेवण्याची संधी मिळेल, यामुळे अधिक नफा मिळू शकेल.
👉 रेल्वे स्थानकावरच माल साठवता आल्यामुळे माल हलवण्याचा खर्च कमी होणार.
👉 रेल्वेद्वारे थेट मोठ्या बाजारात माल पाठवता येणार.
👉 सरकारी किंवा सहकारी संस्था खत विक्रीसाठी या ठिकाणी स्टॉक ठेवू शकतात
👉 शेतकऱ्यांना वेळेवर खत, बियाणे उपलब्ध होणार.
👉 खाजगी दलालांपासून होणाऱ्या लूटीतून बचाव होईल.
👉 उत्पादनाची किंमत वाढवण्याची संधी

या निर्णयामुळे नगरसूल रेल्वेस्थानकावर खते थेट उतरवली जाऊ शकतील. यामुळे आतापर्यंत मनमाड किंवा नांदगाव येथे खते उतरवून ती रस्त्यामार्गे येवला आणि लासलगाव परिसरात पोहोचवावी लागत होती, ती गरज संपुष्टात येईल. यामुळे वाहतूक खर्चात बचत होईल आणि शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध होतील. तसेच, कांदा आणि मका यांसारख्या महत्त्वाच्या पिकांची साठवणुकीसाठीही सुरक्षित सुविधा मिळेल.

छगन भुजबळ यांनी या यशाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाप्रबंधक अरुणकुमार जैन यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, “नगरसूल हे येवला-लासलगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. येथे कव्हर्ड गुड्स शेडची सुविधा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान टळेल आणि त्यांना आर्थिक फायदा होईल.”

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे नगरसूल रेल्वेस्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या वाहतुकीत सुरक्षितता मिळेल आणि बाजारपेठेत त्यांचा माल चांगल्या भावात विकला जाऊ शकेल. छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांबद्दल संपूर्ण येवला तालुक्यातील शेतकरी समुदायाने आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.