संगमनेर शहर सुरक्षेच्या मुद्द्यावरून आमदार तांबे आक्रमक

संगमनेरमधील ५० लाखांची सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली; आमदार तांबेंनी जिल्हा नियोजन समितीत उठवला पोलिसांच्या निष्क्रियतेचा गंभीर मुद्दा

संगमनेर, 12 मे: शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून ५० लाख रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडली आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, महिला सुरक्षा, चोऱ्या, टोळी युद्ध आणि गुंडागिरीला उत्तेजन मिळत आहे.

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा निकामी:

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सत्यजीत तांबे यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये हायटेक कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून, नगरपालिकेने ही संपूर्ण यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहे. मात्र, पोलीस यंत्रणेच्या उदासीनतेमुळे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. याचा परिणाम म्हणून शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

पोलिस प्रशासनच जबाबदार:

आमदार तांबे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संगमनेर हे एक वैभवशाली आणि व्यापारी महत्त्वाचे शहर असून, येथे दररोज लाखो नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा निकामी राहिल्यामुळे शहरात अशांतता निर्माण झाली आहे. “५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणेची देखभाल का होत नाही? यामागे पोलिसांची उदासीनता आहे की कोणाचा दबाव?” असे थेट प्रश्न त्यांनी विचारले.

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी तातडीने कारवाईची मागणी:

या बैठकीनंतर पोलीस प्रशासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार तांबे यांनी यावेळी पोलीस प्रशासनावरच गुन्हेगारी वाढल्याचा आरोप ठेवून, तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करण्याची आणि शहरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.

आता पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन त्वरित योग्य पावले उचलते का, याकडे संपूर्ण संगमनेर शहराचे लक्ष आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त सर्वांकडून करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.