शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेच्या वाढीसाठी ‘संवाद-प्रक्रिया’ संशोधन होणार; विश्‍वकर्मा विद्यापीठ आणि सह्याद्री फार्म्स यांच्यात सामंजस्य करार

शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पनेच्या वाढीसाठी ‘संवाद-प्रक्रिया’ संशोधन होणार

विश्‍वकर्मा विद्यापीठ आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्यात सामंजस्य करार

शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ देशभरात वेगाने मूळ धरत आहे. केंद्र शासनासह अनेकविध विभाग ही चळवळ पुढे नेण्यासाठी विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. शेतकरी समूहाच्या पातळीवरही या संकल्पनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.तरीही ह्या संकल्पनेचा व्यावसायीक अवलंब करताना अनेक पातळ्यांवर अद्यापही आव्हानात्मक परिस्थिती आहे. बाजार, पतपुरवठा, तंत्रज्ञान अशा अनेक पातळ्यांवर पुढील कालावधीत एकात्मिक पध्दतीने सगळ्याच संबंधीत घटकांनी काम केल्यास या संकल्पनेचे फायदे छोट्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. हे पाहता या संकल्पनेतील विविध विषय परिणामकारक पध्दतीने सर्वच प्रकारच्या माध्यामांतून सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. या उद्द्येशानेच पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठ, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. देशभरातील विविध माध्यमांमधून शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीच्या संदर्भात शास्त्रशुध्द ‘संवाद-प्रक्रिया’ संशोधन करणे हा या करारामागील उद्देश आहे.

सह्याद्री फार्म्सचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष विलास शिंदे आणि विश्‍वकर्मा विद्यापीठाचे मिडीया व कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. चेतन कापडणीस यांनी नाशिक येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

यावेळी विलास शिंदे म्हणाले, “ लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ ही एकमेव आशा आहे.शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ भारतात रुजत आहे आणि ती शास्त्रोक्त पद्धतीने संबंधितांना आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. केंद्र सरकारही त्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि सर्व माध्यमांमधून माहितीचा योग्य प्रसार आवश्‍यक आहे.”

सह्याद्री फार्म्सच्या पुढाकाराने शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरु झालेल्या ‘एच-स्क्वेअर- इन्क्युबेशन सेंटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले म्हणाले की शेतकरी उत्पादक कंपनीकडे ग्राहकांसह सर्व भागधारकांना जोडण्यासाठी संवाद प्रक्रिया असणे आवश्‍यक आहे, ज्याचा सगळ्याच माध्यमांना देखील उपयोग होईल. डॉ. चेतन कापडणीस म्हणाले की, संवाद मॉडेल विकसित करण्याच्या प्रक्रियेत विश्‍वकर्मा विद्यापीठ हे संबंधित सर्व घटकांना सहभागी करून घेईल.

कृषी क्षेत्राला माध्यमांच्या मुख्य प्रवाहाच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ.किरण ठाकूर या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना व्यक्त केले.

या कराराच्या माध्यमातून होणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे जो शेतकरी उत्पादक चळवळ आणि त्याच्या संवाद धोरणांचा अभ्यास करेल. अशी माहिती विश्‍वकर्मा विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रा. वैभव ठाकरे यांनी दिली. यावेळी प्रा.मयुरेश बेलसरे, प्रा.राहुल मते, सुरेश नखाते आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.