गुन्हेगारी वाढतेय… आणि आम्ही राजकीय लोक त्यात भर घालतोय!” – दिलीप वळसे पाटलांची धक्कादायक कबुली!
राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळतेय? माजी गृहमंत्र्यांचा अप्रत्यक्ष इशारा कोणाला?
मंचर, २३ मार्च – राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुका पत्रकार संघ कार्यशाळेत धक्कादायक भाष्य केले आहे. “राज्यात गुन्हेगारी वाढतेय, तरुणाई गुन्हेगारीकडे वळतेय आणि आम्ही राजकीय लोक त्यात भर घालतोय,” अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे आहे? ते स्वतःच सरकारमधील काही नेत्यांना लक्ष्य करत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतो.
राज्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर वळसे पाटील चिंतेत
पुण्यातील कुख्यात कोयता गँग असो किंवा बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी—राज्यात सर्रासपणे बंदुका आणि पिस्तुलांचा वापर वाढला आहे. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, “तरुणांच्या हाताला काम नाही, नोकरी नाही, त्यामुळे नैराश्यातून ते चुकीच्या मार्गाला लागतात. आणि या सगळ्यात आम्हीच राजकीय लोक भर घालतो.” त्यांचे हे वक्तव्य राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
सत्ताधारी नेत्यांना अप्रत्यक्ष टोला?
राज्यातील अनेक गुन्ह्यांचा राजकीय नेत्यांशी संबंध उघड झाला आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांचे धनंजय मुंडेंशी जवळचे संबंध, ढाकणे कुटुंब मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले यांची माजी मंत्री सुरेश धस यांच्याशी जवळीक, तसेच इतर अनेक गुन्हेगारी घटनांमुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत माजी गृहमंत्र्यांचे हे वक्तव्य नेमकं सरकारमधील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका आहे का?
वळसे पाटलांच्या वक्तव्याचा सरकारला धक्का?
माजी गृहमंत्र्यांचे हे विधान महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यांनी बोलून गेलेले सत्य राजकीय दबावाखाली आले आहे का, की ते राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दल जाणीवपूर्वक बोलले? आगामी काळात त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधक कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.