मा. ना. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकारातून म्हाळसाकांत योजने संदर्भात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
मंचर, दि. २४
हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावरील आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी असणाऱ्या लोणी धामणी परिसरातील शेतीला लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून देण्याचा आणि या योजनेला कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालात समावेश केला जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
या बैठकीत आंबेगाव-शिरूरच्या पाण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी क्षेत्रातील वंचित शेतीला पाणी देण्यासाठी प्रस्तावित कळमजाई, फुलवडे व बोरघर या उपसा सिंचन योजनांची मंजुरी आदिवासी विभागाच्या निधीतून पूर्ण करण्याच्या अटीवर होती. आता या उपसा सिंचन योजनांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्यांना सुरुवातीला कुकडी प्रकल्पाच्या उपलब्ध निधीमधून निधी देऊन या योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांना आदिवासी विभागाकडून मिळणारा निधी हा परतफेड स्वरूपात नंतर घेण्यात येणार आहे.
यासोबतच घोड, मीना व कुकडी नदीवरील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्यास शासनाने तत्वता मान्यता दिली आहे. आता WAPCOS या संस्थेकडून करण्यात येत असलेल्या, कुकडी प्रकल्प फेरजल नियोजन अभ्यासामध्ये या बंधार्यांना पाणी उपलब्ध करून या 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये कुकडी प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिंभे धरणापासून सुरू होणारा डिंभे डावा कालवा 55 किलोमीटर लांबीचा आहे. सततच्या आवर्तनांमुळे कालव्याची दुरावस्था झाली होती. सन 2021-22 मध्ये सहकारमंत्री मा. श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामधून या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 27 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. आता डिंभे डावा कालवा विशेष दुरुस्तीसाठी उर्वरित 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून, संपूर्ण डिंभे डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने डिंभे डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालणार असल्याने डिंभे माणिक डोह बोगद्याची आवश्यकता राहणार नाही.
शिरूर तालुक्यातील पाबळ केंदूर परिसरातील चासकमान आणि कुकडी प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित बारा गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिरूर तालुक्यातील पाबळ केंदूर परिसरातील चासकमान आणि कुकडी प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित बारा गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. यानुसार या वंचित 12 गावातील अस्तित्वातील तलाव पावसाळा कालावधीमध्ये कुकडी प्रकल्पातून किंवा चास कमान प्रकल्पातून घोड /भीमा नदीवरून भरून देणे तसेच याव्यतिरिक्त नवीन जलसंधारण तलाव बांधण्याचा देखील या अभ्यासामध्ये समावेश असणार आहे.
या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.