जयहिंद लोकचळवळ बुलढाणा जिल्हा विभाग खामगाव शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत भरून देणार ‘RTE’ प्रवेश प्रक्रिया अर्ज !
खामगाव : ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी अचूक अर्ज भरणे गरजेचे आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. खामगाव शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांचे अर्ज जयहिंद लोकचळवळ खामगाव कार्यालयात अचूक व मोफत भरून दिले जातील, तरी पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळ बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांनी केले आहे.
आदर्श लोकप्रतिनिधी आ. सत्यजीत दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ बुलडाणा च्या वतीने विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु १६ एप्रिल पासून सुरु झाली असून ३० एप्रिलच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांसाठी २५ टक्के ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेला आता प्रारंभ झाला आहे. विद्यार्थ्यांना १६ ते ३० एप्रिलपर्यंत ‘आरटीई’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
राज्य शासनाने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील ‘आरटीई’ प्रवेश घेण्यासाठी पूर्वीच्या निकषांत बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळेत प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नाही, पण इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा आहे, त्या विद्यार्थ्याला तेथे प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून खरोखरच त्या अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा आहे की नाही, याची खात्री गुगल मॅपिंगद्वारे केली जाणार आहे.
काही जिल्हा परिषदेच्या, महापालिका, नगरपालिकांच्या तर काही खासगी अनुदानित नामांकित शाळांमध्ये दरवर्षी प्रवेशासाठी मोठी झुंबड असते. अशा शाळांमध्ये प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याठिकाणी ‘एनआयसी’च्या माध्यमातून लॉटरी काढावी लागेल. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्याच्या घरापासून एक किमी अंतरावर केवळ इंग्रजी माध्यमाची खासगी विनाअनुदानित शाळा आहे, अशाठिकाणी देखील लॉटरी काढावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
सध्या ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यास मंगळवारी सुरवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर त्याची छाननी होऊन लॉटरी निघेल आणि लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील. दरम्यान, ज्या शाळांमध्ये लॉटरीची गरज भासणार नाही, त्याठिकाणी ‘आरटीई’तून प्रवेशासाठी पात्र मागेल त्या विद्यार्थ्याला थेट प्रवेश मिळतील. खामगाव शहर आणि तालुक्यातील विद्यार्थ्यांचे अर्ज जयहिंद लोकचळवळ खामगाव कार्यालयात अचूक व मोफत भरून दिल्या जातील, तरी पालकांनी जयहिंद लोकचळवळ कार्यालय एकता कॉम्प्लेक्स, जलंब नाका नांदुरा रोड, खामगाव येथे दुपारी ३ते ५ या वेळात येवून आपल्या पाल्यांचे अर्ज अचूक व मोफत भरून घ्यावे, असे आवाहन जयहिंद लोकचळवळ बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांनी केले आहे.