रणसंग्राम जवळच! दोन टप्प्यात एफआरपी देऊन दाखवा राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा
मुंबई | ऊस एफआरपी मुद्द्यावर सध्या माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उसाची एफआरपी देताना मागील हंगामाचा साखर उतारा, ऊस तोडणी व वाहतूक खर्च विचारात घेतला जात होता. परंतु आता राज्यसरकारने नवीन परिपत्रकाद्वारे त्या त्या हंगामातील उतारा, तोडणी व वाहतूक खर्च विचारात घ्यावा, असा अध्यादेश काढला आहे. यामुळे अप्रत्यक्ष रित्या एफआरपीचे दोन तुकडे होणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर सडकून टिका केली. या संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, ऊस दर नियंत्रण समितीच्या शिफारशीमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेलाच आहे, असे असताना राज्य सरकार दोन टप्प्यात एफआरपी देण्याचे वेगळे परिपत्रक काढू शकत नाही. हे परिपत्रक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. केंद्र सरकारचे परिपत्रक राज्य सरकारने पुन्हा एकदा वाचावे, असा सल्ला शेट्टी यांनी सरकारला दिला.
।।रणसंग्राम जवळच आहे।।
महाविकास आघाडीच्या सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांच्यात हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफ. आर. पी चा पहिला हप्ता २२०० रूपये देऊन कारखाने चालूच करून दाखवा – मा.खा.@rajushetti @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @TV9Marathi @abpmajhatv pic.twitter.com/TPfObVbd2A— स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत (@swabhimani7227) February 21, 2022
शेतकऱ्यांचे पैसे वापरण्यासाठी एफआरपी उशिरा देण्याचे कारस्थान रचले जात आहे. केंद्राच्या ऊस दर नियंत्रण आदेशाची मोडतोड करण्याचा अधिकार राज्याला नाही. त्यामुळे सदर आदेश बोगस आहे. केंद्राने कारखानानिहाय एफआरपी काढायला वेळ लागत असल्याने राज्यसरकारला फक्त एफआरपीची आकडेमोड करण्याचा अधिकार दिला होता. एफआरपीचे सूत्र बदलण्याचा नव्हे. मी यापूर्वीच केंद्राकडून याबाबत माहिती घेतली आहे. यंदा हंगाम संपेपर्यंत एफआरपीला थांबावे लागणार आहे. इथेनॉलनिर्मितीमुळे झालेली साखर उताऱ्यातील घट मोजण्यासाठी सक्षम संस्था सहा महिने लावतील. मग शेतकऱ्याला पैसे मिळणार तरी कधी, असा सवाल त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये दरोडेखोर साखर कारखानदारांचे एक टोळके आहे. या टोळक्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला तर कायदा हातात घेऊन तो हाणून पाडू. महाविकास आघाडी सरकार व कारखानदारांच्या टोळक्यांमध्ये हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपी देऊन दाखवा. रणसंग्राम जवळच आहे, असा इशारा शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.