ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा होईल असं ते सांगू शकतात, पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही …

महाराष्ट्रात पुढील २५-३० वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हि टीका केली आहे. भाजप हा पक्ष जागतिक स्तरावरचा आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान भाजपचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात असा टोला राऊत यांनी लगावला. महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भविष्य आहे असंही ते यावेळी म्हणाले.

“जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच पडते. त्यांचा जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले. “शिवसेना भाजप युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वैगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कुणी परस्पर काही बोलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजपा युतीत आम्ही २५ वर्ष एकत्र होतो, हे नातं भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे,” असं राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.