“माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही” म्हणणाऱ्या रोहित पाटील यांची निकालानंतरची प्रतिक्रिया
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीत दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.
रोहित पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी पक्षावर झालेला अन्याय असो किंवा येथील प्रश्न असतील ते घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला. हा विजय सर्वसामान्यांचा आहे. आम्ही लोकांसमोर विकासकामं घेऊन गेलो, लोकांच्या अडचणी समजून घेत होतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच हा विजय झाला,” असं रोहित पाटील म्हणाले.
निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आबांच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. आज आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे. प्रचारातील भाषणाचा धागा पकडत बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. आबांनी तसंच सुमनताईंच्या नेतृत्वात केलेलं काम लोकांनी पाहिलं आणि त्यामुळेच लोकांनी हा कौल दिला आहे”.