पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती नाही वाटली, आपल्याच देशात फिरताना भीती वाटतेय – कन्हैया कुमार

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती नाही वाटली, आपल्याच देशात फिरताना भीती वाटतेय – कन्हैया कुमार

नवी दिल्ली | पंजाब दौऱ्यावर राजकीय सभेसाठी जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी सडकून टीका केली आहे. मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही. त्यांना आपल्याच देशात फिरायला भीती वाटते, असे म्हणत कन्हैया कुमार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असतील, तर त्यांनी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करायला नको, असेही मत यावेळी कन्हैया कुमारने मांडले.

गोव्यात आयोजित युवा स्पंदन या कार्यक्रमात बोलताना कन्हैया कुमार म्हणाले, ‘दोन दिवसांपासून टीव्हीवर सुरू आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली. २४ तास हेच सुरू आहे. मात्र, मोदींकडे ५६ इंचची छाती असताना घाबरण्याची गरज काय? भाजपवाले म्हणतात पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतात, देशाचे असतात. पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे नसतील, तर मग पंतप्रधानांनी कोणत्याही पक्षाचा प्रचारही करू नये.’

‘जर सुरक्षेत त्रुटी असतील तर तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्याकडे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे मित्र आहेत, विशेष सुरक्षा पथक (SPG) त्यांच्या अंतर्गत आहेत. तुम्ही तपास करून सुरक्षेत कुठे चूक झाली हे शोधा. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते. हे अजिबात चालणार नाही,’ असं कन्हैय्या कुमार यांनी म्हटलं.

‘एकीकडे म्हणायचं मजबूत पंतप्रधान आहेत आणि दुसरीकडे पळून जातात,’ असं म्हणत कन्हैय्या कुमार यांनी मोदींवर निशाणा साधला. कन्हैया कुमार पुढे म्हणाले, ‘ सुरक्षेतील त्रुटीचं निमित्त करून पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पंजाब आपल्या देशाचा भाग आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते. एसपीजीचे प्रमुख गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीचा प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या जिगरी मित्राला विचारला पाहिजे.’
‘ही सर्व नौटंकी आहे. यांना आधीपासून माहिती आहे की पंजाबमध्ये गावागावात भाजपाच्या स्थानिक नेत्यांनाही गावात घुसू दिलं जात नाहीये. जेव्हा स्थानिक नेत्यांनाच येऊ दिलं जात नाही, तेव्हा पंतप्रधान मोदींना येऊ दिलं जाईल का? हे माहिती असूनही यांनी पंजाबमध्ये कार्यक्रम ठरवला. पण लोक आलेच नाहीत. ट्रक पाठवून ५०० रुपये देऊन तुम्ही गर्दी करू शकत नाही. हे उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं, पंजाबमध्ये नाही,’ असंही कन्हैया कुमार यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.