‘अनिल परब गद्दार! राष्ट्रवादीच्या सोबतीनं शिवसेना संपविण्याचा घाट रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना आणि रामदास कदमला संपविण्याचा घाट अनिल परब घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला आहे.

मनसे व राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना आणि रामदास कदमला संपविण्याचा घाट अनिल परब घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी

– रामदास कदम

उद्धवजी पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्वासाने मंत्रिपद दिले. ते कुणाची घरे फोडणे, इतर पक्षांच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून शिवसेना नेत्यांना संपवणे अशी कामे करत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगावे, अशी विनंती कदम यांनी केली आहे.

कदम यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, सूर्यकांत दळवी यांनी ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत व जिल्हा परिषद निवडणुका, विधासनभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये उघडपणे शिवसेनेच्या विरोधात काम केले आहे, अशी तक्रारही त्यांनी केली आहे.

नुकत्याच नारायण राणे यांच्या जनयात्रेमध्ये ज्यांनी आवर्जुन हजेरी लावली. त्यात सूर्यकांत दळवीची (सूर्याजी पिसाळ) पक्षातून हकालपट्टी का होत नाही. याचे आकलन नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सोबतच मनसेचा नगराध्यक्ष वैभव खेडेकर याच्या भ्रष्टाचाराला आपलेच मंत्री खतपाणी घालतात. त्याला मदत करतात. मग आपल्या मंत्र्यांचा हेतू काय, फक्त रामदास कदम याला संपविणे असाच आहे का, असा प्रश्न त्यांनी पत्रातून विचारला आहे. उद्धवजी अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचे प्रकरण गाजत आहे. त्या साई रिसॉर्टच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचा माजी आमदार व मनसे नगराध्यक्ष कसा जातो? त्याचे फोटोसह आपल्याला पुरावे देईन. मी, आम्ही नेमके काय करायचे? मात्र, मी शिवसेनेचा नेता आहे, त्याचे भान आहे. त्यामुळे आजपर्यंत किरीट सोमय्या यांच्याकडे कधीही संपर्क साधला नाही, बोललो नाही व त्यांच्याशी काहीही संबध नाही, असंही ते म्हणाले.

कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यासोबत मागील चार वर्षांपासून काम करत आहे. भेटी अंती सविस्तर बोलू, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.