लखीमपूरचे हत्याकांड हे ‘सुनियोजित कारस्थान’ असल्याचा विशेष तपास पथकाचा निष्कर्ष
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश येथे ३ ऑक्टोबर रोजी शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आले होते. या प्रकरणात आठ लोकांचा मृत्यू झाला होता. हे संपूर्ण प्रकरण ‘सुनियोजित कारस्थान’ असल्याचे विशेष तपास पथकाने सांगितले आहे. तसेच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा या प्रकरणातला मुख्य आरोपी असून त्याच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्येही आता वाढ करण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली आहे.
लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं हा विचारपूर्वक केलेल्या नियोजित कटाचा भाग होता, असं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) म्हटलं आहे. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाच्या प्रमुखांनी न्यायाधीशांना याबाबत चिट्ठी लिहिली आहे. यात आशीष मिश्राविरोधातील आरोप दुरुस्त केले पाहिजे असं म्हटलं आहे. या प्रकरणी आशीष मिश्रा आणि त्याचे इतर सहकारी हत्या आणि कटाच्या आरोपांचा सामना करत आहेत. यात हत्येचा प्रयत्न (attempt to murder) आणि काही गंभीर आरोपांचा समावेश करण्याची शिफारस या एसआयटीने केली आहे.
३ ऑक्टोबर रोजी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु असताना केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र आशिष मिश्रा यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात इतर चार जणांचा मृत्यू झाला होता.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आणि सत्ताधारी भाजपाविरोधात सत्ताविरोधी जनमत असताना या घडामोडी भाजपाची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.