द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नी खा.अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केल्या या मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी आज संसदेत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी खा.कोल्हे यांनी केली.

द्राक्ष निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी भेडसावणारा प्रश्न म्हणजे जहाजावर द्राक्षाच्या कन्टेनर्ससाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. मालवाहतुकीचे दरही प्रचंड वाढले आहेत.

“पवार साहेब केंद्रीय कृषीमंत्री असताना विशेष कृषी योजनेंतर्गत ७ टक्के अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान ३ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. केंद्र सरकारने यात पुन्हा बदल करून अनुदानात वाढ करावी, त्याचबरोबर प्रत्येक कन्टेनरमागे अडीच लाख रुपये अनुदान देण्यात यावे” अशी मागणी खा.कोल्हे यांनी संसदेत बोलताना केली.

युरोपची द्राक्षाची मागणी २५ लाख मेट्रिक टन असताना आपला देश केवळ १ लाख मेट्रिक टन द्राक्षे निर्यात करतो या वास्तवाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असेही आवाहन खा.कोल्हे यांनी केले.

सध्या द्राक्षांचा हंगाम सहा महिने आहे, तो ९ महिने होण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाची गरज आहे. मात्र हे प्लास्टिक आच्छादन शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची सूचनाही त्यांनी केली.

अशा पद्धतीने खा.कोल्हे यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले. या मागण्यांवर केंद्र सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.