कलाकार अशोक हांडे व रंजना हांडे यांना यशवंत-वेणू पुरस्कार प्रदान

समाजाची बदलती व्याख्या आणि बदलता अर्थ खेदजनक - उल्हासदादा पवार, ज्येष्ठ नेते

पुणे | सामाजिक विषमता मोडून अस्पृश्यता निवारण करण्याचे महात्मा गांधीचे धोरण यशवंतराव चव्हाणांनी अवलंबिले होते. कारण समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक आणि विस्तारलेली होती. आज मात्र समाजाची व्याख्या आणि अर्थ बदलतो आहे, याचा खेद वाटतो, असे मत ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरुड शाखेतर्फे यशंवतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येणाऱ्या यशवंत वेणू पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यंदाचा यशवंत वेणू पुरस्कार सुप्रसिद्ध कलाकार अशोक हांडे आणि त्यांच्या पत्नी रंजना अशोक हांडे यांना उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, उद्योजक अमित गोखले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकारणात वावरत असताना आपल्या या क्षेत्राचा स्पर्श व्यक्तीगत स्वार्थाला आणि कौटुंबिक स्वार्थाला होऊ न देणारे व्यक्तीमत्ल म्हणजे यशवंराव चव्हाण होते. यशवंतरावांनी केलेल्या बेरजेच्या राजकारणात सामाजिक अभिसरणाचा पाया होता. जातीनिष्ठ आणि उपजातीनिष्ठ राजकारणदेशासाठी घातक आहे, असे सांगणारे यशवंतराव समाज विकासाच्या सर्व स्तरांना कायम महत्त्व देणारे होते. त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ रस्ते, धरणं आणि संस्थांची उभारणी एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. तर विकासाचे दोन डोळे आहेत असे यशवंतराव नेहमी म्हणायचे.

त्यातील एक डोळा भौतिक विकासाचा तर दुसरा डोळा साहित्य आणि संस्कृतीचा आहे, असे म्हणणाऱ्या यशवंतरावांनी आपल्या कृतीच्या माध्यमातून या दोन्ही डोळ्यांना कायम समान स्थान दिल्याचे दिसून येते. लोकसंस्कृतीवर त्यांचे निस्सीम प्रेम होते तसेच कलावंत आणि साहित्यिकांबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. हा आदर त्यांनी नेहमीच आपल्या कृतीतून व्यक्त केलेला दिसून येतो असे मत उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.

पुरस्काराला उत्तर देताना अशोक हांडे म्हणाले की, सह्याद्रीचा बाणा असलेले यशवंतरावांचे व्यक्तीमत्व हे हिमालयासारखे उत्तुंग होते. आपल्या कणखर भूमिकेतून देशाचे डोके म्हणजे काश्मीर वाचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी यशवंतराव चव्हाण यांनी करून दाखवली. लहानपणी गर्दीत हरवू नये म्हणून आपल्या आईचे बोट घट्ट धरून वाटचाल करणाऱ्या यशवंतरावांनी पुढील संपूर्ण आयुष्यात आईच्या विचारांचे बोट कधीच सोडले नाही.

त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या यशवंतरावांचे बोट आपण सोडून चालणार नाही. भविष्याचा वेध घेत महाराष्ट्राला परिपूर्ण विकासाच्या वाटेवर चालायचे असेल, तर यशवंतरावांचे बोट धरूनच आपल्याला पुढे जावे लागेल.

लोकशाहीवर कायम विश्वास ठेवणारे यशवंतराव नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. त्यांनी जपलेला वसा, वारसा आणि संस्कृती ही पुढच्या पिढीला समजावून सांगण्याची जबाबदारी आपल्यावर येते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. मिलींद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धात शांता शेळके यांच्या गीतांवर आधारीत जीवन गाणे गातच रहावे, हा कार्यक्रम सादर झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.