येवला बाजार समितीच्या कामकाजात ‘एआय’चा वापर करण्याचे भुजबळांचे आवाहन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला बाजार समितीतील ७.५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

येवला, दि.२३ जून :-* हे जग तंत्रज्ञानाच्या विकासाने अधिक पुढे चाललं आहे. या स्पर्धेत राज्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी शासनाने आर्टिफिशल इंटेलिजन्स यंत्रणा वापरली जात आहे. या यंत्रणेचा अभ्यास करून बाजार समितीमध्ये ही ए. आय. यंत्रणा विकसित करावी. त्यातून शेतकऱ्यांना वेळेवर आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल त्यातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होणार आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर कांदा निर्जलीकरण केंद्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला बाजार समिती व अंदरसुल उपबाजार समितीतील ७.५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी अंदरसुल उपबाजार येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कांदा निर्जलीकरण प्रकल्पाची घोषणा:
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा निर्जलीकरण प्रकल्प साकारण्यात येत आहे येवला-लासलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेत कांदा निर्जलीकरण केंद्र उभारण्याचे निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले, “या प्रकल्पामुळे कांद्याचा साठा ठेवणे आणि त्याला चांगला बाजारभाव मिळविणे शक्य होईल. शासन यासाठी सर्व आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे”.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डोंगरगाव उपबाजारासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच या उपबाजारासाठी शासनाकडून जागा उपलब्ध होईल. सात बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसल्यामुळे पात्र असूनही तालुक्यातील १७०० हून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे यासाठी शासनाकडे आपला पाठपुरावा सुरू असून या शेतकऱ्यांना ही मदत लवकरच प्राप्त होईल. येवला तालुका हा केवळ कांद्याचा उत्पादक म्हणून नव्हे,तर कष्टकरी,हुशार व उद्यमशील शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. येथील बाजार समितीचा इतिहासही गौरवास्पद आहे. ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक दशकांपासून कार्यरत असून पारदर्शक व्यवहार,शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामकाज व वेळोवेळी सुधारणा या धोरणांवर कार्य करत आहे.

आज आपण जे बाजार समितीचा चेहरा पाहत आहोत,तो मागील काही वर्षांतील नियोजनबद्ध विकासाचा परिणाम आहे.आपल्या येवला बाजार समितीत गेल्या काही वर्षांत महत्त्वाची पायाभूत कामे झाली आहेत.बाजार समिती ही सहकार तत्वावर चालणारी एक संस्था आहे. येवला बाजार समितीचा हा विकास म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी प्रक्रिया आहे. आगामी काळात येवला बाजार समितीच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया उद्योग, रेशीम बाजार पेठ व कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील.येवला बाजार समितीचा विकास अधिक व्यापक, सुसंवादी आणि शाश्वत करणे, ही आपली सर्वोच्च प्राधान्यक्रमातली जबाबदारी असणार असल्याचे मंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

📍 येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला मुख्य आवार येवला जनावरे शेड जवळ व प्रवेशद्वारातील रस्ता ट्रिमिक्स कॉक्रीटीकरण करणे तसेच प्रवेशद्वार दुरुस्ती करणे

📍 मुख्य आवारातील कार्यालयाचे व उपहारगृहाचे नुतनीकरण व बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन, (र.रु. ११२ लक्ष)

📍मुख्य आवारातील सेलहॉलचे उद्घाटन (र.रु.१७७ लक्ष)

📍येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदरसुल येथील कॉटन मार्केट आवारातील जागा ट्रिमिक्स कॉक्रीटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २०५ लक्ष)

📍येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदरसुल येथील जुन्या आवारात सेलहॉलचे बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. १२१ लक्ष)

यावेळी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारुतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुणमामा थोरात, विश्वासराव आहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,गट विकास अधिकारी संदीप वायाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, माजी सभापती किसनकाका धनगे, सचिव के.आर. व्यापारे,संचालक वसंत पवार, संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक वसंत पवार, रतन बोरनारे, संजय बनकर,अल्केश कासलीवाल,लताताई गायकवाड,बापू गायकवाड कांतीलाल साळवे,भास्कर कोंढरे,संजय पगार,नंदकिशोर आट्टल,भरत समदडिया,अर्जुन ढमाले, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मोहन शेलार, मकरंद सोनवणे, रायभान काळे,मकरंद सोनवणे, पप्पू सस्कर,येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सरपंच लताताई जानराव, उपसरपंच अमोल सोनवणे, योगेश जहागीरदार, बबनराव साळवे,भागीनाथ पगारे, जगन जगताप येवला कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार अंदरसूल समितीचे सदस्य, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.