महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मंगल कलश यात्रा महत्वाची – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीची मंगल कलश यात्रा नाशिक शहरात ; महाराष्ट्र हा यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय महत्वाचे - छगन भुजबळ
नाशिक,दि.२९एप्रिल:- आपला महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीपथावर राहिला आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या सर्वांचे स्मरण करत आपल्या राज्याची वाटचाल यापुढील काळातही यशोशिखरावर राहण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या गौरव शाली महाराष्ट्र उत्सव उपक्रमांतर्गत आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांचे स्मरण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकशाहीर वामनदादा कर्डक, साहित्यिक बाबुराव बागुल, ज्ञानपीठकार वि.वा.शिरवाडकर, समाजसुधारक दादासाहेब गायकवाड, स्वातंत्र्य सेनानी वसंत हुदलीकर यांच्या वारसांचा सन्मान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संपूर्ण राज्यातील महत्वाची पवित्र ठिकाणे तसेच या देशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करत याठिकाणची माती आणि पाणी मंगल कलशातातून संकलित करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्याच्या इतिहास सर्व समाजासमोर मांडला जात आहे. आपल्याला इतिहास माहिती असेल तरच आपली वाटचाल ही सुखकर होत असते. तसेच या यात्रेतून मंगल कलश एकत्र करण्यात येत असल्यामुळे राज्यात आणि देशात एकतेची भावना निर्माण करण्यास ही यात्रा अतिशय महत्वाची आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्राला सहज कुठलीही गोष्ट मिळालेली नाही. राज्याच्या लढ्यात १०६ हुतात्मे झाले आहे. त्याचं योगदान apa कायम स्मरणात ठेवले पाहिजे. गेल्या ६० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव करावारचा लढा सुरू आहे. आपला हा महाराष्ट्र संपूर्ण देशाचा महत्वाचा कणा आहे. देशात सध्या युद्धाचे सावट आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्याचा वाटा हा अधिक मोलाचा वाटा राहील त्यामुळे सर्वांनी आपलं योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, हुतात्म्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काढण्यात आली आहे. या रथयात्रेत जातीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रस्ताविक करत उपक्रमाबद्दल माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात गौरव शाली महाराष्ट्र उत्सव उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील सहा विभागातून मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नाशिक शहरात दाखल झाली. त्यानंतर रामशेज किल्ला, बोधिवृक्ष, स्व.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक नोट प्रेस, कुसुमाग्रज स्मारकातील मंगल कलशाने आडगाव येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. यानंतर काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्यांच्या वारसाचा सत्कार हुतात्मा स्मारक, नाशिक येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विभागात मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे. त्या सर्व मुंबईतील जांबोरी मैदानावर महाराष्ट्र दिनी दि.१ मे रोजी एकत्रित येणार आहे. १ ते ४ मे असा चार दिवसाचा “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव” राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, महाराष्ट्राची यशोगाथा, आर्ट कॅम्प, चित्रकार कलाकृती दालन असे विविध दालनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन घडविण्यात येत आहे.
यावेळी राज्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी प्रशांत कदम, रवींद्र पाटील, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, गौरव गोवर्धने, चेतन कासव, समाधान जेजुरकर, ॲड.चिन्मय गाढे, जगदीश पवार, प्रसाद सोनवणे, संजय खैरनार, नितीन चंद्रमोरे, जीवन रायते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.