बिबट्यांच्या नसबंदी विषयात सत्यजीत तांबे आग्रही!

सत्यजीत तांबे यांची वनमंत्र्यांकडे कुक्कुटपालक शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजनांची मागणी

अहिल्यानगर, ९ एप्रिल – जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक भागांमध्ये कोंबड्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाच्या योजनेत कोंबड्यांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळत नाही ही गंभीर बाब आहे.

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले. “कोंबड्यांचे संगोपन हे अनेक शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन आहे, शेतकऱ्यांचे होणारे नुकसानाला भरपाई गरजेचे आहे” असे स्पष्ट करत तांबे यांनी शासनाच्या नुकसानभरपाई धोरणात सुधारणा करून कोंबड्यांचाही समावेश यामध्ये करावा, अशी ठोस मागणी त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य पावले उचलण्याची व त्यांची नसबंदी करण्याचा पर्यायही गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.