बार्टी’ने येवला मुक्तिभूमी स्मारक ताब्यात घेऊन त्याचे सनियंत्रण करावे- मंत्री भुजबळ यांचे निर्देश
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारका संदर्भात बार्टी, समाज कल्याण आयुक्त, आणि इतर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- मंत्री छगन भुजबळ
मुंबई, १० जुलै -राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज मंत्रालयात येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक याविषयी आढावा बैठक घेतली. यावेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत मुक्तिभूमी स्मारकाच्या व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात बार्टी (BARTI) या संस्थेला स्मारकाचा ताबा देण्याची मुख्य सूचना केली.
📌 येवला मुक्तिभूमी स्मारक परिसर सनियंत्रण व परिरक्षणासाठी अद्याप कोणत्याही संस्थेकडे सोपविण्यात आलेला नाही. तात्पुरत्या स्वरूपात बार्टी ही संस्था या जागेची देखभाल करत आहे.
📌 त्यानुसार त्यांनी स्मारक कामाची पाहणी व नियमानुसार तपासणी करून इमारतीचा ताबा घेण्याबाबतची माहिती सादर करावी.
📌 जिल्हा वार्षिक योजनेतून बांधलेले शॉप (गाळे) बार्टीने ताब्यात घेऊन ते व्यावसायिकांना वितरीत करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी.
📌 टप्पा- २ इमारतीच्या शेजारील रस्त्यालगतची जागा हस्तांतरणाबाबत निर्णय घेऊन संरक्षण भिंत व गेट बांधकाम पूर्ण करून घ्यावे.
📌 यामध्ये आवश्यक ते सहकार्य संबंधित यंत्रणांनी करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे, हा यामागील हेतू आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वय साधून विहित वेळेत सर्व कामे पार पाडावीत, असे निर्देश दिले.
मुक्तिभूमीचे ऐतिहासिक महत्त्व :
दादरची चैत्यभूमी आणि नागपूरची दिक्षाभूमी याप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्व आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
स्मारकाच्या विकासाचे टप्पे:
मुक्तिभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आपल्या प्रयत्नांतून या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी १५ कोटी रुपये निधीतून भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल इ. निर्माण करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग साकारण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग या कामांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये साकारलेल्या १५ कोटींच्या कामांचे उद्घाटन ३ मार्च २०२४ रोजी नॉर्वेतील वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्धगया येथील बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन व इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी. अरियपला यांच्या हस्ते पार पडले.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार हाच मुख्य हेतू:
मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले की, “या स्मारकाचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्याद्वारे समाजप्रबोधन करणे आहे.” त्यामुळे, सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करून हे स्मारक जनतेसाठी पूर्णपणे उपयुक्त ठरविणे आवश्यक आहे.
दादर येथील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दिक्षाभूमी यांच्या बरोबरीने येवलाच्या मुक्तिभूमीला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. हे स्थळ केवळ एक पर्यटन आकर्षण नसून, सामाजिक न्याय, बौद्ध धम्म आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे केंद्र बनविण्याचे महत्त्वाचे ध्येय आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाचा पुढील विकास होणार आहे, ज्यामुळे ते जागतिक स्तरावर एक प्रमुख तीर्थस्थळ बनेल.