फुले वाड्यातून क्रांतीचं पाणी पेटलं आणि देशातील सामाजिक क्रांती सुरु झाली – छगन भुजबळ
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फुले दाम्पत्याच्या समग्र वाड्मयाचे पुनर्मुद्रित पुस्तकांचे वितरण
पुणे, दि. ११ एप्रिल :- ज्यावेळी दलित बहुजन समाजाला कुणी पिण्याचे पाणी देत नव्हते त्यावेळी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या विहिरीचे पाणी बहुजन समाजासाठी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले.त्यांना बरोबर बसून भोजन केल. याठिकाणी बाल संगोपन गृह सुरु केले. विधवा परितक्त्या महिलांना आपल्या घरात स्थान दिले. त्यांच्या मुलांचे संगोपन केले. आज जे आपल्याला शक्य होऊ शकत नाही हे त्या काळात फुले दाम्पत्याने केले. जगात एकाच वेळी एका दाम्पत्याने सामाजिक चळवळीचे केलेले हे कार्य अतिशय दुर्मिळ आहे. याच फुले वाड्यातून क्रांतीच पाणी पेटलं आणि देशातील सामाजिक क्रांती सुरु झाली. आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली तर महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती केली असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाड्मयाचे पुनर्मुद्रित पुस्तकांचे वितरण आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अनेक दिवसांपासून उपलब्ध नसलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाड्मयाचे पुनर्मुद्रण होऊन हे साहित्य उपलब्ध झाले आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे ग्रंथ प्रत्येकी ५० रुपये या सवलतीच्या दरात वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. या महापुरुषांचा इतिहास आपण विसरत चाललो आहोत. तो या साहित्यातून जिवंत राहतो. सामाजिक सेवेचे काम करत असतांना फुले दांपत्याला कर्मठ ब्राम्हण वर्गाने विरोध केला तसेच अंधश्रद्धा बाळगणाऱ्या बहुजन समाजातील लोकांनीही सुद्धा विरोध केला. जसे विरोध करणारे होते तसेच या सामाजिक कार्यात भिडे,भवाळकर, परांजपे,चिपळूणकर अशा अनेक ब्राम्हणांनी फुले दाम्पत्याला मोठी साथ दिली आहे. त्यामुळे महात्मा फुले यांचा लढा हा ब्राम्हणांच्या विरोधात नाही तर ब्राह्मण्यवादाच्या अंधश्रद्धेच्या विरोधात होता. सामाजिक क्रांतीची सुरुवात या वाड्यातून झाली आहे. त्यामुळे ही जागा आपल्या सगळ्यांसाठी ऊर्जा केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सन १९९१ साली शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रथमतः या साहित्याची शासनामार्फत छपाई करून नाममात्र दहा रुपयात हे समग्र वाड्मय उपलब्ध करून दिले होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देशभरात हे साहित्य आपण पोहोचविले.त्यानंतर बराच कालावधीपासून हे समग्र वाड्मय छापले गेलेले नव्हते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी तातडीने याबाबत आदेशित करून हे समग्र वाड्मय पुनर्मुद्रित करण्याचे आदेश दिले.त्यानंतर या खात्याचे मंत्री आपले ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दादा पाटील यांनी केवळ पन्नास रुपयात समग्र वाड्मय उपलब्ध करून दिली आहे. आज हे साहित्य वितरित करताना विशेष आनंद होत आहे.त्याबद्दल सरकारचे मी आभार मानतो. खरंतर महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेलं साहित्य आजही आपल्या समाजाच्या विकासासाठी तितकेच महत्वपूर्ण आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांच्यावर मराठीत सत्यशोधक चित्रपट प्रकाशित झाल्यानंतर त्यांचे हे कार्य जगभरात पोहोचविण्यासाठी आता हिंदी भाषेत ‘फुले’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाबद्दल काही वाद निर्माण केले जात आहे. खरतर मी त्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा केली. त्यांनी जे पुरावे आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कुठलेही वाद निर्माण होऊ न देता फुले दाम्पत्याचा हा इतिहास जगासमोर येउद्या असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, महात्मा फुले वाडा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे एकत्रिकरण तसेच भिडे वाड्यातील स्मारक यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यां नी तातडीने निधी मंजूर करून दिला. मात्र अधिकारी वर्गाकडून काम होतांना दिसत नाही त्याबद्दल आपण नाराजी व्यक्त केली. तसेच प्रसंगी आंदोलन करू असे सुद्धा आपण सांगितले. काल अधिकाऱ्यांनी हे भूसंपादन करण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच हे काम होईल अशी आशा व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार हेमंत रासने, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, ‘फुले’ चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका केलेले कलाकार प्रतिक गांधी, दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्मात्या अनुया चौहान कुडेचा, सहनिर्माते रोहन गोडांबे, महात्मा जोतीराव फुले चरित्र साधन प्रकाशन समितीचे सर्व सदस्य, प्रा. दिवाकर गमे, प्रितेश गवळी, मंजिरी धाडगे, डॉ. स्नेहा सोनकाटे, यश बोरावके, योगेश पिंगळे, पंढरीनाथ बनकर, सपना माळी, अविनाश चौरे, वैष्णवी सातव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.