आमदार सत्यजीत तांबे यांची जिल्हा प्रशासनाकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कार्यालयाची मागणी
पेन्शनर्स असोसिएशनला स्वतंत्र जागेची गरज; अहिल्यानगर परिसरात शासकीय जागा देण्याची मागणी
२५ एप्रिल, संगमनेर: जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र आणणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनला कायमस्वरूपी कार्यालयाची आवश्यकता असल्याचे भान देऊन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून या संस्थेसाठी अहिल्यानगर परिसरात योग्य ती जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आमदार तांबे यांनी स्पष्ट केले की, पेन्शनर्स असोसिएशन ही संस्था जिल्ह्यातील हजारो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर पाठिंबा पुरविणारी एक महत्त्वाची संघटना आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात आरोग्य, पेन्शन, विविध शासकीय योजनांचा लाभ यासारख्या अनेक बाबतीत मार्गदर्शन करणे, सदस्यांच्या समस्या शासनदरबारी मांडणे तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणे अशा विविध कार्यांत ही संस्था सक्रिय आहे. मात्र, अद्याप संस्थेकडे स्वतःचे कार्यालय नसल्यामुळे बैठका घेणे, कागदपत्रांचे व्यवस्थापन करणे आणि सदस्यांशी संपर्क साधणे यासारख्या मूलभूत कार्यांमध्येही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आमदार तांबे यांनी या संदर्भातील पत्रात पुढे म्हटले आहे की, सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन ही संस्था शासकीय सेवेतील अनुभवसंपन्न आणि नागरिकांच्या हितासाठी झटलेल्या व्यक्तींची असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील कोणतीही रिकामी शासकीय जागा या संस्थेला वापरासाठी दिली जाऊ शकते.
या मागणीमागील पार्श्वभूमी स्पष्ट करताना तांबे यांनी सांगितले की, संगमनेर परिसरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत असून, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाची आवश्यकता अधिकच जाणवत आहे. अहिल्यानगर परिसर हे सोयीस्कर ठिकाण असल्याने तेथे जागा देण्यात आल्यास अधिकाधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मदत मिळू शकेल.
जिल्हा प्रशासनाकडून याबाबत लवकरच अनुकूल निर्णय होईल अशी आशा व्यक्त करताना आमदार तांबे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असेही म्हटले आहे. या मागणीला स्थानिक पातळीवरही पाठिंबा मिळाल्याचे दिसून येत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनीही आमदार तांबे यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, शासनाकडून लवकरच योग्य निर्णय होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे.
या संदर्भात पुढील कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते पावले उचलली जात आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हिताच्या या महत्त्वाच्या मागणीला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सर्वानी व्यक्त केली आहे.