अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये १३,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे गंभीर नुकसान झाले आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १३,१९४ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या गहू आणि हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला असून, भाजीपाला आणि फळपिकांनाही या पावसाचा गंभीर दणका बसला आहे.कृषी विभागाने नुकताच तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असून, अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात नोंदवले गेले असून, सुमारे ५,८७८ हेक्टर क्षेत्रावरील पिके प्रभावित झाली आहेत.
बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका, बाजरी यांच्यासह भाजीपाला व केळी, द्राक्ष, आंबा, डाळिंब, पपई, संत्रा यांसारख्या फळपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय, चारापिकांनाही मोठा फटका बसला आहे, ज्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.
राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून, येथील सहा तालुक्यांमध्ये सुमारे ५,७९५ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये सुमारे ५,०४२ हेक्टर पिकांचे नुकसान नोंदवले गेले आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल आणि कृषी विभागाने युद्धपातळीवर सुरू केले असून, त्याचा अंतिम अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे कृषी विभागातील अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हानिहाय नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये) लातूर ४६
सांगली १८६ कोल्हापूर २०
सोलापूर १५० सातारा १२
नाशिक ५७९५ नंदुरबार ३७८
बुलढाणा ५०४२ अकोला २२
अमरावती १ यवतमाळ २६
अहिल्यानगर ८९२ पुणे १४
सिंधुदुर्ग १७रत्नागिरी १३
लातूर ५१४ परभणी ६६
एकूण १३१९४