संगमनेरच्या गणोजी शिर्केंकडून रचला जातोय मोडतोडीचा कट!
आ. अमोल खताळ यांच्याकडून आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय!
संगमेनर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय हा प्रशासकीय सोयीसाठी नसून, राजकीय हेतूने प्रेरित आहे असे दिसत आहे. प्रशासनाने राजकीय दबावाखाली घेतलेला हा अन्यायकारक निर्णय तालुक्याच्या एकात्मतेला तडा देणारा असा आहे.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असला, तरी संगमनेर शहर मध्यवर्ती असल्याने येथेच सर्व प्रशासकीय सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालयाची गरज असेल, तर घारगाव किंवा साकूर येथे त्याची स्थापना होणे अधिक योग्य ठरले असते. मात्र, तालुक्याची मोडतोड करून आश्वी बुद्रुक येथे निर्मिती करण्याचा निर्णय जनहितासाठी नसून राजकीय फायद्यासाठी घेतलेला आहे.
संगमनेर हा स्वातंत्र्यसैनिकांचा तालुका आहे, येथील जनता अन्याय सहन करणार नाही असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत. जर हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर संपूर्ण तालुका या विरोधात मोठे जनआंदोलन उभारेल. प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा संगमनेर तालुका रस्त्यावर उतरेल, हे निश्चित!