पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भुजबळांकडून निषेध, शांतता राखण्याचं आवाहन

महाराष्ट्रातील ६ पर्यटकांसह २८ जण ठार : दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे प्रयत्न

महाराष्ट्र, २३ एप्रिल: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन कुरणावर मंगळवारी दुपारी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला जबरदस्त धक्का बसला आहे. याबद्दल देशभरातून व जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून व्हिडीओ जारी करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच अशा परिस्थितीत सर्व भारतीयांनी, हिंदू-मुस्लिम यांनी एकजूट व शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दुपारी अडीचच्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २८ निरपराध नागरिकांना जीव गमावावा लागला होता. त्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील समावेश आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ हून अधिक जखमींपैकी अनेकांची अवस्था गंभीर आहे.

पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन येथील हा गोळीबार झाला. हे ठिकाण दाट पाइन जंगलांनी आणि हिमालयीन पर्वतरांगांनी वेढलेले असून, ग्रीष्मऋतूमध्ये पर्यटकांचे प्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाते. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांनी हल्ल्याचा मुख्य आरोपी सैफुल्लाह खालिद (लष्कर-ए-तैयबा कमांडर) असल्याची नोंद केली आहे.

या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी, पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तसेच पनवेलचे दिलीप देसले यांसह महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांमध्ये एस. बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोभित पटेल यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की “पहलगाममधील हा दहशतवादी हल्ला मुंबईतील २६/११ सारखाच भीषण आणि निर्दयी आहे. या भ्याड कृत्यामागील आतंकवाद्यांना कडक शिक्षा मिळालीच पाहिजे.” या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छगन भुजबळ यांनी तीव्र निषेध केला. त्याचवेळी त्यांनी सर्व मुस्लिम नेते आणि संघटनांना विनंती केली की, त्यांनी पुढे येऊन या घटनेचा ठामपणे निषेध केला पाहिजे. हा हल्ला भारतातील धार्मिक सलोख्याला धोका पोहोचवणारा आहे, अशावेळी सर्वांनी शांतता राखून सरकारच्या सुरक्षा यंत्रणेच्या पाठीशी राहण्याचं, तसेच अशा वेळेला आपण सगळ्यांनी देशामध्ये शांत राहून आपल्या शहरांमध्ये दंगेधोपे होणार नाहीत याची दोन्ही बाजूनी काळजी घेतली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

काश्मीरमध्ये सुरळीत चाललेलं जनजीवन पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना पाहावलं नाही, त्यांना ते नको आहे. अराजक निर्माण करायचं, या हल्ल्यातून हिंदुस्तानातील हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करायची, असा हेतू या हल्ल्यामागे असू शकतो, परिणामी पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या बातमीने मोठा धक्का सर्व भारतीयांना बसला . या दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यात निश्चितपणे यश मिळेल, अशी खात्री भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत करण्यासाठी आणि देशात धार्मिक तेढ वाढविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. परंतु आपण सर्वांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध करून शांततेच्या मार्गाने व एकजुटीने भारत सरकारच्या पाठीशी उभे राहून या घटनेचा निषेध केला पाहिजे त्यातून आपल्या देशाची एकता जगासमोर येईल असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

दरम्यान केंद्र सरकारने या घटनेला गंभीरतेने घेतले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्वरित बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि सेनेच्या विशेष तुकड्यांना सीमावर्ती भागात तैनात केले गेले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्ल्याच्या तपासासाठी विशेष तपास गट नेमला आहे. या दुःखद घटनेने देशभरातील नागरिकांच्या मनावर गडद छाप सोडली आहे. या दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या झालेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांना हृदयपूर्वक सहानुभूती व्यक्त करत, या भीषण हल्ल्याचा सर्वांनी एकजुट होऊन निषेध केला पाहिजे. अशा प्रसंगी देशाची एकता आणि सामाजिक सौहार्द राखणे हेच खरे कर्तव्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.