उत्तरप्रदेश मध्ये भाजपला मोठा धक्का, मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि 4 आमदारांनी सोडला पक्ष

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे, भाजपचे उत्तर प्रदेश सरकार मधील एक मंत्री आणि चार आमदारांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांच्यासोबत सामील झाले. योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यानंतरच्या काही तासांत, त्यांच्या जवळच्या आणखी चार आमदारांनी – रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.

ओबीसी (इतर मागासवर्गीय) नेते आणि पाच वेळा आमदार असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (BSP) सोडल्यानंतर 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मुकाबला करण्यासाठी ओबीसी मतदारांचा एक महत्त्वाचा भाग आकर्षित करण्याच्या भाजपच्या योजनांमध्ये ते केंद्रस्थानी होते.

“वेगळी विचारसरणी असूनही, मी योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात समर्पणाने काम केले. पण दलित, ओबीसी, शेतकरी, बेरोजगार आणि छोटे व्यापारी यांच्यावर होणार्‍या गंभीर अत्याचारामुळे मी राजीनामा देत आहे,” असे मौर्य यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे. त्यांनी पत्रकारांना असेही सांगितले की “माझ्या बाहेर पडण्याचा भाजपवर काय परिणाम होईल हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. “त्यांचे पत्र ट्विटरवर येताच, अखिलेश यादव यांनी श्री मौर्य यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आणि त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे समाजवादी पक्षात स्वागत केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातील नाराजी ही भाजपने दुर्लक्षित केली हे आजच्या या 5 आमदारांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे स्पष्ट झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.