राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

राजस्थानमध्ये यावर्षी अखेरीस विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. राजस्थानात सत्तापालट करण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. सचिन पालयट यांनी राजस्थानमध्ये सभांचं आयोजन केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापही १० महिने बाकी आहेत. त्यापूर्वी सचिन पायलट हे पुढील आठवड्यापासून शेतकरी आणि युवकांना संबोधित करणार आहेत. राजस्थानमध्ये ‘भारत जोडो यात्रे’ला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण, राज्यातील नेतृत्वाबाबत ( मुख्यमंत्री पद ) अद्यापही निर्णय न झाल्याने दबावाचे राजकारण करण्यासाठी सचिन पायलट यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मात्र, पायलट यांच्या निकटवर्तीयाने या वृत्ताचं खंडण केलं आहे. ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेनंतर तरुण, शेतकरी यांच्यातील उत्साह कायम राखण्यासाठी सभांचं आयोजन करण्यात येत आहे तर, भाजपा मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे. याकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.