दिल्लीला धडक मारायला आलात तर डोकं राहणार नाही जागेवर – नारायण राणे
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर राणेंची शिवसेनेवर टीका
भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, “भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज ढिंढवडे निघतायत. काय बोलताय, काय करताय? मुख्यमंत्री बारामतीला गेले. त्यावेळी शेतकरी प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन त्यावर बोलावं. काहीच बोलले नाही. नुसती टिंगल टवाळी.”
“मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्यानंतर त्याच पवारांकडे लाचार होऊन मुख्यमंत्री पद स्विकारलं. शरद पवारचं आपले सर्वकाही आहेत. त्यांच्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं, असं उद्धव ठाकरे सांगतायत.”, असं म्हणत महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी उद्धव यांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याची नारायण राणेंनी आठवण करुन दिली आहे.
देशात विधानसभा आणि लोकसभेच्या काही पोटनिवडणुका पार पडल्या त्यात भाजपला मोठा फटका बसला. त्याबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की, “पोटनिवडणुकांमध्ये दादरा हवेलीची जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. शिवसेनंनं मात्र डंका सुरु केला आम्ही महाराष्ट्राबाहेर जिंकलो. त्या जिंकलेल्या उमेदवाराची निशाणी निशाणी एक फलंदाज बॅट घेऊन उभा आहे, अशी होती. पण दुसऱ्यांच्या मुलांची बारशी करायची सवय शिवसेनेला आहेच. आम्हाला मोठं यश मिळालं, आता आम्ही दिल्ली काबीज करणार, असं शिवसेना सांगत सुटली. हे लिखाण करताना मला वाटतं भान नसणार संजय राऊतांना. रात्री जे करायचं ते दिवसा केल्यामुळे असा परिणाम होतोय का? मला माहित नाही.”