खेडेकर सरकारचे जावई आहेत का? आ.रामदास कदम यांचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई | शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावरील आरोपांचा पाढा वाचत थेट आपल्याच सरकारवर आज विधानपरिषदेत हल्लाबोल केला. मनसेचे नेते खेडेकर यांना ताबडतोब निलंबित करा नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराचल रामदास कदम यांनी दिला आहे.

रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. नगराध्यक्ष खेडेकर यांनी नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. याबाबत 20 प्रस्ताव सादर केले. खेडेकर यांना अपात्र करण्यासाठी 50 टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. सादर केलेल्या 20 पैकी 11 मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने 15 दिवसात त्यांना अपात्र केलं पाहिजे. पण दोन महिने झाले हा प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केलं जात नाही. 11 मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं आहे. त्यांना पाठिशी का घालता? ते तुमचे जावई आहेत का? असा सवाल आ.कदम यांनी केला.

खेडेकरांवर कारवाई केली जात नाही गुन्हा दाखल केला जात नाही. उलट त्यांना पोलीस बंदोबस्त दिला जातो. दोन पोलीस त्यांना दिले आहेत. का दिलं संरक्षण? शक्य असेल तर त्याची चौकशी करा, असं सांगतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाचं काय झालं हे नगरविकास खात्याने सांगावं, असंही ते म्हणाले. नगरविकास खात्यावर कुणाचा दबाव आहे, कोणत्या नेत्याकडून दबाव आला आहे हे मला माहीत आहे, असं सांगतानाच त्यांना निलंबित करा नाही तर नाईलाजाने मी न्यायालयात जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भ्रष्ट माणसाला सरकार पाठिशी घालत असेल तर पुरवणी मागण्यांना पाठिंबा का द्यायचा? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.