राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! वाचा काय आहे हे प्रकरण?

परळी वैजनाथ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश परळी येथील न्यायालयाने दिले आहेत. जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे वॉरंट काढण्यात आले आहे. २२ आँक्टोबर २००८ रोजी राज ठाकरेंना मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या गाड्यांवर बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली होती. यात बसच्या समोरील काचा फोडण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते. या प्रकाराला स्वराज श्रीकांत ठाकरे यांनी चिथावणी दिली असा ठपका ठेवण्यात आला.

त्यामुळे येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २०८/२००८ अन्वये गुन्हा कलम १४३, ४२७, ३३६,१०९ भारतीय दंड विधीनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात राज ठाकरे व कार्यकर्ते जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम.मोरे- पावडे यांनी दिला आहे. आता परळी पोलिस राज ठाकरेंना अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.