भाजप हतबल झालंय, गॅंग अयशस्वी पक्षात अंतर्गत खदखद – नवाब मलिक
दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदी करता आले नाही. राज्यातील भाजप आता हतबल झाला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मलिक म्हणाले की, विरोधी पक्षाची गँग अयशस्वी झालीय. भाजपमध्ये आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणवीसांना हटवायचंय? असा प्रश्न निर्माण झालाय. याआधीही भाजपमध्ये अंतर्गत नवे विरुद्ध जुने वाद निर्माण झाला होता.
चुकीच्या लोकांना सोबत घेऊन फडणवीस राजकारण करत होते. विनोद तावडेंसारखे नेते आता केंद्रात मोठ्या पदावर गेले आहेत. पक्षाने बावनकुळेंना विधानपरिषद उमेदवारी दिली आहे ज्यांना फडणविसांनी बाजूला केलं होते. यावरुन अस दिसतंय की भाजपला आता बाजूला केलेल्या नेत्यांना पुन्हा पुढे आणायचं आहे. यावर भाजपचं केंद्रीय नेतृत्व काय तो निर्णय घेईल, असं नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले की, भाजपमध्ये अंतर्गत खदखद सुरू आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपतून अनेक नेते परत येणार आहेत लवकरच घरवापसीचा कार्यक्रम सुरू होणार आहे, असंही मलिक म्हणाले.