कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यावरुन सत्यजीत तांबेंचे भाजपला परखड सवाल!
अभिनेत्री कंगना राणावतच्या बेताल वक्तव्यावरुण सत्यजीत तांबेंचे भाजपला परखड सवाल!
अभिनेत्री कंगना राणावतने एका कार्यक्रमात ‘१९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही भिक होती’, अस बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून तीव्र निषेध केला जातोय. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या बॅकग्राउंडला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिकृती दिसत आहे. पटेलांच्या योगदनामुळे हा देश एकसंघ बांधला गेला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कंगना राणावत च्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत भाजपला काही परखड सवाल ही विचारले आहेत. सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट करत कंगनावर निशाणा साधला आहे.
सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेले प्रश्न:
कंगणा राणावतच्या मुक्ताफळांवर भाजप गप्प का?
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महात्मा गांधींना प्रातःस्मरणीय मानणारा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा गगनचुंबी पुतळा उभारणारा भाजप हा पक्ष या विभूतींना खरोखर मनापासून मानतो का?
स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या क्रांतीकारकांच्या जयंती व पुण्यतिथी भाजपकडून जोरात साजऱ्या केल्या जातात. या सर्व गोष्टी फक्त देखावा आहेत का?
भाजप पदोपदी दाखवत असलेले क्रांतिकारकांबद्दलचे प्रेम बेगडी आहे का?
२०१४ पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, तेव्हा भारत पारतंत्र्यात होता का?
कंगनाच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसेल, तर भाजपचा एकही नेता पुढे येऊन ते चुकीचे असल्याचे का सांगत नाही?
भाजपचे हे मौन म्हणजे भाजप कंगणाशी सहमत आहे, असे मानायचे का?
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या असंख्य हुतात्म्यांचा अवमान करणारे हे वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपकडून यावर अद्याप एकही प्रतिक्रिया आलेली नाही. या मुद्यावरुनच सत्यजीत तांबे यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप आता या प्रश्नांची उत्तरे देईल का हे पाहणे औत्सुक्याचा विषय आहे.