खा.जया बच्चन यांचा राज्यसभेत संताप, केंद्र सरकारला दिला शाप
राज्यसभेमध्ये ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या खा. जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढला. राज्यसभेत बोलताना जया बच्चन यांनी विधेयकाच्या चर्चेऐवजी थेट १२ निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली.
“आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही सरकारकडून न्यायाची अपेक्षा करत नाही, पण तुमच्याकडून करू शकतो. तुम्ही या सभागृहाच्या किंवा बाहेर बसलेल्या १२ सदस्यांना कसं संरक्षण देत आहात?” असा सवाल खा.बच्चन यांनी सभापतींना केला.
या दरम्यान आपण विधेयकावर चर्चा करत नसल्याचं सभापतींनी बच्चन यांना सांगितलं. यावर बच्चन यांनी म्हंटले की “ही माझी बोलण्याची वेळ आहे. आम्हाला तीन ते चार तास फक्त एक क्लेरिकल एररवर चर्चा करण्यासाठी दिले आहेत का?” असं त्या म्हणाल्या. तसेच, विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “मैं आप से पूछती हूँ, आप किस के सामने बिन बजा रहे हो?”
याचदरम्यान भाजपा खासदार जुगल लोखंडवाला यांनी जया बच्चन यांना उद्देशून काहीतरी वैयक्तिक टिप्पणी केली. यामुळे गोंधळ अजूनच वाढला आणि जया बच्चन यांचा पारा त्याहून जास्त वाढला. “ते माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकतात? ही फार वाईट बाब आहे की तुमच्यामध्ये थोडाही सेन्स नाही आणि बाहेर बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांबाबत थोडाही सन्मान नाही”, असं खा. बच्चन म्हणाल्या.
यावेळी बोलताना जया बच्चन यांनी रागाच्या भरात “तुम्हा लोकांचे वाईट दिवस फार लवकर येणार आहेत, मी तुम्हाला शाप देते”, असं म्हटलं. यामुळे सभागृहातला गोंधळ अजूनच वाढला. त्यामुळे सभापतींनी लागलीच कामकाज काही काळासाठी तहकूब केलं.
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर जया बच्चन यांनी म्हंटले की “मला कुणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. जे काही घडलं, ते फार दुर्दैवी होतं आणि त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नको होतं”, असं त्या म्हणाल्या.
जया बच्चन यांच्या या संतापाचं कारण थेट ऐश्वर्या राय बच्चनच्या चौकशी बरोबर जोडण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.