अधिकारांचा अतिरेक सूरू आहे : पवारांची प्रतिक्रिया!
दिल्ली | सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यवहारांशी संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची, मुलींची चौकशी करणं हा अधिकारांबाबतचा अतिरेक आहे, असं पवार म्हणाले.
अशाप्रकारे अधिकारांचा गैरवापर कितीदिवस सहन करायचा हे लोकांनी ठरवायचं आहे. काही लोक वेडीवाकडी भाषणं, आरोप करून बोलतात आणि ते बोलल्यानंतर केंद्रीय संस्था संबंधित कार्यवाही करण्यासाठी पुढं येतात, हे सर्वांत आक्षेपार्ह असल्याचंही पवार म्हणाले.
मुंबईतील बोटीवर ड्रग्जसंबंधी छापा टाकला. त्यात आरोपींना घेऊन गेलेले लोक शासकीय संस्थेचे नव्हते. नंतर ते साक्षीदार म्हणून बोलावले होते, असं सांगण्यात आलं.
पण साक्षीदार हे साक्ष देण्यासाठी असतात, आरोपींना पकडून नेण्याचं काम मात्र एनसीबीनं करायला हवं. त्यात हे साक्षीदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते आरोपींना घेऊन जात असल्याचं दिसून आलं. अशा कारवाई व्हायलाच हव्या, पण त्या निमित्तानं चुकीचा पायंडा पडू नये, असं मत पवारांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी गेल्यास निकाल त्यांच्या बाजुने लागेल, असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत असल्याचं दिसत आहे. मात्र असे निर्णय वेळोवेळी घ्यायचे असतात, असं म्हणत पवारांनी याबाबत अधिक बोलणं टाळलंय.
पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यादृष्टीनं ठोस पावलं उचलली जातील, याची खात्री असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.