तहसीलदार असावा तर असा,”तुमचं नुकसान होणार नाही हाच हेतू”,नागरिकांसाठी लिहिलेलं पत्र ठरतंय कौतुकाचा विषय

विविध शासकीय कार्यालयात कामे घेऊन गेलं की अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येते. परंतु, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत देखील नागरिकांची कामे रखडू नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी वेगळी शक्कल लढवली असून कार्यालयाच्या बाहेर नागरिकांच्या नावे पत्र लिहीत एक फलक लावला आहे. तहसीलदारांनी त्यावर त्यांच्या स्वतःचा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक त्याचबरोबर कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावलेला हा फलक आता चर्चेत आला असून नागरिकांचे काम देखील सोपे होत आहे.

नागरिकांस पत्र अशा आशयाचे फलक तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले असून यावर लिहिले आहे की, आदरणीय नागरीक, आपण कामानिमित्त तहसिल कार्यालयात आलात आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. आपण ज्या कामासाठी आलात ते काम पूर्ण करुन समाधानी होवूनच आपण या कार्यालयातून जावे ही आमची इच्छा आहे. परंतु, काही कारणास्तव आपले काम वेळेत होत नाही,असे आपणास वाटल्यास अधिकारी, कर्मचारी दौऱ्यावर असल्यास किंवा सुट्टीवर असल्यास, आपण बाहेर गावावरून प्रवास करून दूरवरून आलात आणि कार्यालयाची वेळ संपली असल्यास एखाद्या वेळी आपणास सकाळीच एखादा दस्तऐवज /प्रमाणपत्र घेऊन नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठी जायचे आहे. दस्तऐवज/प्रमाणपत्र तहसील मधून आपणास हवा आहे परंतु रात्री हा दस्तऐवज/प्रमाणपत्र आपणास कसा मिळणार यामुळे आपले नुकसान होणार असेल तसेच एखाद्यावेळी तहसिल कार्यालयास एक/दोन / तीन दिवसांची सुट्टी असेल तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली असेल अशा वेळी आपण परत जाऊ नका.

खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा आम्ही आपले काम कार्यालयीन वेळेनंतर/सुट्टीच्या दिवसातही करू आपल्या कोपरगांव तालुक्यातील कोणत्याही नागरीकांचे तहसील कार्यालयापासून मिळणाऱ्या एखाद्या प्रमाणपत्रामुळे कोणतेही नुकसान होऊ नये हाच प्रामाणिक हेतू आहे. त्यामुळे निःसंकोचपणे आपण कोणत्याही अडचणीच्या वेळी आम्हास संपर्क करा आम्ही आपली मदत करण्यास बांधिल असून सदैव तत्पर आहोत,असे लिहिले आहे.

सध्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागं अनेक प्रकारची कामं लागलेली असतात. अनेक बैठका असल्याने नागरिकांना तहसीलदारांची भेट अनेकवेळा चकरा मारूनही शक्य होत नाही, आणि त्यामुळे नागरिकांची कामे आडू नये यासाठी कोपरगावच्या तहसीलदारांनी राबवलेला हा “बोरुडे पॅटर्न” चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांची कामे सुट्टीच्या दिवशी देखील होत आहे. ज्या नागरिकांची नजर या फलकावर जात नाही त्यांची कामे होण्यास विलंब होत असला तरी अशा नागरिकांनी देखील तहसीलदारांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपले कागदपत्राची कामे करुन घ्यावी असे, आवाहन तहसीलदार विजय बोरुडे यांनी केले आहे. कोपरगावच्या तहसीलदारांचा आदर्श इतरांनी घेतला तर नक्कीच नागरिकांची कामे आडणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.