राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई | कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळा बंद होत्या विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. आता मात्र सरकारने या बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत त्यातील हा तिसरा टप्पा आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पेडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.

यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत तसेच पेडियाट्रिक टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे प्रा.गायकवाड यांनी म्हटले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या कालावधीतही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा आणि शिक्षकांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर यापुढेही कोविड-19 विषयीची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थी प्रथमच प्रत्यक्ष शाळेत येतील, त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल, असे त्या म्हणाल्या. याबाबत सातत्याने मार्गदर्शक सूचना करणाऱ्या टास्क फोर्सचेही प्रा.गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.