मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता
महाविकास आघाडी सरकारने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसंबंधी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मान्यता देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या जलसंपदा विभागाने पूर्वीच्या मंजूर पाणी वापरातील त्रुटी आता दूर केल्या आहेत. मध्य मराठवाड्यासाठी ही बाब अतिशय सुखद आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
जे प्रकल्प पाण्यावाचून थांबले होते त्या प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. बीड, हिंगोली, नांदेड या भागातील पाण्याचे प्रश्न तसेच प्रकल्पांतील अडथळे दूर होतील आणि या भागातील सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळेल. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे असे पाटील यावेळी बोलताना म्हणाले.