मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा ज्यांचा जन्म देखील झाला नव्हता ते सुद्धा विचारायला लागले ३५ वर्षात काय केलं?

दहीहंडीच्या मंचावरून ना. दिलीपराव वळसे पाटील यांचा विरोधकांवर निशाणा

मंचर, दि. २७.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर येथे आयोजित दहीहंडी उत्सव राज्याचे सहकारमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून त्यांनी सर्व गोपाळ भक्तांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी बोलत असताना वळसे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा ज्यांचा जन्म देखील झाला नव्हता ते सुद्धा विचारायला लागले ३५ वर्षात काय केलं?” असे खडे बोल त्यांनी विरोधकांना सुनावले. तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी तालुक्यातील नवीन विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा देखील उल्लेख केला. यामध्ये आंबेगाव-शिरूर तालुक्यातुन प्रतिभावान खेळाडू मिळावे यासाठी मंचर क्रीडा संकुलासाठी ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात असून, घोडेगाव येथे नवीन सभागृहासाठी १३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आपण विरोधकांना बोलून नाही तर कामाच्या माध्यमातून उत्तर द्यायचे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

या महोत्सवाला गोविंदा पथकांचा व नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत ‘गोविंदा रे गोपाला’च्या जयघोषात परिसर निनादून सोडला होता. सिने अभिनेता गश्मिर महाजनी व सिने अभिनेत्री गायत्री दातार यांचे विशेष आकर्षण यावेळी होते. त्यांनी उपस्थित राहात या उत्सवाची रंगत वाढवली. याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या विविध गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहत सलामी दिली व आपले कौशल्य दाखवून दिले. यावेळी परिसरातील नागरिकांनी हा मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवायला मिळाला.

आंबेगाव तालुका बजरंग दल संचलित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले गोविंदा पथक, मंचर या गोविंदा पथकाने 5 थर लावत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. ना. दिलीपराव वळसे पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते या विजेत्या गोविंदा पथकाचे बक्षीस देत अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.