राजकीय सोयीसाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भाजपविरोधात लढता येणार नाही – बाळासाहेब थोरात
काँग्रेसचा तृणमूल काँग्रेसला आणि ममता बॅनर्जीना टोला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्या दरम्यान यूपीए कुठे आहे? असा सवाल करत काँग्रेसला छेडलं होतं. या टीकेला उत्तर देण्यासाठी राज्यातील व देशातील काँग्रेस नेते आता काँग्रेसची भूमिका मांडत आहेत. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही एका निवेदनाद्वारे आपली भूमिका सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे.
या निवेदनात बाळासाहेब थोरात म्हणतात की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे हे देशाला माहित आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षात काँग्रेसने भाजप सरकारविरोधात निडरपणे लढा लढला आहे. राहुल गांधी आणि गांधी कुटुंबियांवर या दरम्यान भाजप व इतर पक्षांकडून वैयक्तीक हल्ले केले गेले. त्यांच्या बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या, मात्र तरीही राहुल गांधी मागे हटले नाहीत.
राहुल गांधी हे गोरगरिब सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून मोदी सरकारच्या विरोधात पहाडाप्रमाणे ठामपणे उभे राहून लढत राहिले. त्यामुळेच जनतेने त्यांची भूमिका स्वीकारलेली आहे. अशावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करून भाजपविरोधातील लढाई लढता येणार नाही, उलट अशी भूमिका भाजपसाठी अनुकूल ठरणार आहे असं थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.