अखेर काटोलच्या भारत राखीव बटालियनला मंजुरी! अनिल देशमुखांचे स्वप्न होणार साकार
मुंबई | काटोल येथे लष्कराची मोठी बटालियन व्हावी अशी अनिल देशमुख यांची इच्छा होती. यासाठी महिला बटालियन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या तांत्रिक अडचणी दूर करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प प्रस्ताव तयार केला होता. हि बटालियन मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनीही सात्यत्याने पाठपुरावा केला. या विषयावर गुरुवारी मंत्रालयात यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात काटोल तालुक्यातील इसासनी येथे भारत राखीव बटालियनला ५ ला मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली. या निर्णयाबदल सलील देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.
काटोल तालुक्यात बटालियन होण्यासाठी अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले होते. यासाठी ईसासनी येथे १२० एकर शासकीय जमीन सुध्दा हस्तांतरीत करण्यात आली होती. मागील काळात सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणी आल्याने भारत राखीव बटालियन चा प्रस्ताव समोर आला. सुरुवातीला ही बटालियन अकोला जिल्हातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात होणार होती. परंतु याभागात जमीन उपलब्ध होत नसल्याने या बटालियनचा प्रस्ताव धुळखात पडला होता. नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असून देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. सदर भारत राखीव बटालियन हि केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील असल्याने देशात इतरत्र गरज लागल्यास तातडीने इतर राज्यात तैनातीसाठी पाठविण्यास सोयीस्कर होण्यासाठी अकोला ऐवजी नागपूर येथे व्हावी असा प्रस्ताव समोर आला.
नागपूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण असुन दळणवळणा करीता रेल्वे, विमान व महामार्ग यांनी जोडले गेले असल्याने प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. भारत राखिव बटालीयन मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कंपन्या वारंवार पूर्ण संख्याबळासह नक्षल बंदोबस्त, आंतर सुरक्षा बंदोबस्त , राज्याबाहेरील बंदोबस्ता करीता पाठविण्यात येतात. अशा परिस्थितीत भारत राखिव बटालियन ५ याचे कार्यालय नागपूर येथे असल्यास सोईचे होणार आहे. ही बटालियन काटोल येथे होण्यासाठी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले होते. या बटालियनचा पाठपुरावा सलील देशमुख सात्यत्याने करत होते. यासाठी गुरुवारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत गृह सचिव आनंद लिमये, पोलिस हौसिंग चे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर, संजय वर्मा, पंकज डहाने, एस. आर. पी. एफ चे एडीजी चिरंजीव प्रसाद, नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक शेलींग दोरजे, नागपूर ग्रामिणचे अधिक्षक मगर,जि.प.सदस्य सलील देशमुख, अपुन खराडे, शब्बीर शेख, माणिक नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सर्व तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यात आली. जागा हस्तांतर करण्याचा प्रस्ताव सुध्दा तयार करण्यात आला असून २२ मार्च २०२२ ला आदेश सुध्दा काढण्यात आल्याचे या बैठकीत समोर आले. सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर अकोला येथील मंजूर पदांसह व मंजूर आवर्ती / अनावर्ती खर्चासह भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल तालुक्यातील ईसासनी येथे स्थापन करण्याची मान्यदा देण्यात आली आहे तसा शासन निर्णय सुध्दा काढण्यात आला आहे. भारत राखीव बटालियन क्र. ५ ला काटोल येथे मान्यता दिल्याबदल सलील देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठकारे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.