अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र!
नागपूर : कारागृहातून सुटल्यानंतर अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना तिसरे पत्र दिले आहे.
नागपूर : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील महत्त्वाचे नेते अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गेल्या तीन आठवड्यात तीन पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
देशमुख गेल्या महिन्याच्या अखेरीस तुरुंगातून बाहेर आले. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे ते सुमारे चौदा महिन्यांपासून तुरुंगात होते. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिल्यानंतर ते बाहेर आले.अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हातील संत्री व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन राज्य सरकारला अहवाल सुद्धा सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही संत्री उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
संत्री व मोसंबी उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातच बांग्लादेशने आयात शुल्कात मोठया प्रमाणात वाढ केल्याने शिल्लक राहिलेली संत्री व मोसंबीला भाव मिळाला नाही. अशा दुहेरी संकटातून संत्री व मोसंबी उत्पादक जात आहेत, राज्य शासनाने संत्रा व मोसंबी उत्पादकांना भरीव मदत करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्रातून केली आहे. यापूर्वी देशमुख यांनी काटोल येथे न्यायालयाची मागणी केली होती. तसेच मागील सरकारने विकासकामांच्या मंजुरीला दिलेली स्थगित उठवण्याची मागणी केली होती. आता तिसऱ्या पत्रात देशमुखांनी संत्री आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.