बैलगाडा शर्यत स्थगितीसाठी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला – आढळराव पाटील यांचा आरोप

जिल्हाधिकारी कार्यालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकारली त्यानंतर या शर्यती स्थगित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून लांडेवाडीत बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी सुरू होती. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव बैलगाडा शर्यतींचे प्रसिद्धी केंद्र होऊ लागले होते आणि हे काही लोकांच्या डोळ्यात खुपलं आणि त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बैलगाडा मालक आणि आयोजकांवर शर्यत स्थगितीचा आदेश लादण्यात आला, अशी प्रतिक्रीया माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून बैलगाडा शर्यतींना स्थगिती आणली. असे देखील आढळराव पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण अशीच चर्चा बैलगाडा मालकांमध्ये रंगली आहे.

आढळराव पाटील पुढे म्हणाले की, “दिलीप वळसे पाटील सांगत आहेत की, मुख्यमंत्र्यांनी शर्यती बंद करण्याचा आदेश दिला मात्र मुख्यमंत्र्यांनी असा काहीही आदेश दिला नव्हता हे मी बातम्यांमध्ये पाहिलं. महाराष्ट्रात सगळं चालू ठेवा आणि लांडेवाडीची शर्यत बंद ठेवा असं कधीही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नव्हतं. फक्त लांडेवाडीची बैलगाडा शर्यत बंद पडली बाकी सर्व चालू होतं. त्यामुळे हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा होता” आणि जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांनी दबाव आणला म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आढळराव यांनी सांगितले.

बैलगाडा शर्यतीवर अवलंबून असणारे ग्रामीण अर्थकारण याची उदाहरणे देत अनेक नेत्यांनी बैलगाडा शर्यतीप्रती पोकळ सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्षात मात्र छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर लाथ मारण्याचं काम याच नेत्यांनी केले असल्याच्या भावना अनेक बैलगाडा मालकांनी व्यक्त केल्या. बैलगाडा शर्यतीचा केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या नेत्यांनीच बैलगाडा शर्यतीला स्थगिती आणली की काय? असा संशय बैलगाडा मालक व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.