आई कुठे काय करते: लग्न होणारच!आप्पांची तब्येत बिघडल्यानंतरही अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम

लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक आवडती मालिका बनली आहे. मालिकेची कथा आणि कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांची लाडकी आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नात पुन्हा एक विघ्न येणार आहे. मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथानकानुसार, आता अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाला आप्पांनी होकार दिला आहे. मात्र घरातील काही सदस्य त्यांच्या विरोधात असल्याने त्याचा फटका अरुंधतीला बसताना दिसत आहे. अरुंधतीच्या लग्नाला कांचन विरोध करत आहेत मात्र त्याचा धसका आप्पा घेणार आहेत.

अभिषेक आणि अनघा यांच्या मुलीच्या बारशाच्या कार्यक्रमात आशुतोष आणि त्याच्या आईला देखील आमंत्रण होतं. त्यामुळे ते देखील तिथे हजेरी लावतात. परंतु, कार्यक्रम झाल्यावर कांचन आशुतोषच्या लग्नासाठी मुलगी सुचवते. त्यात आशुतोषची आई त्यांना नकार देते. आशुतोषला दुसरी कुणी आवडत असल्याचं सांगते. त्यानंतर कांचन मुद्दाम अनुष्काचं नाव घेते. मात्र आशुतोषची आई ती मुलगी अरुंधती असल्याचं सांगते. आशुतोषची आई म्हणजेच सुलेखा ताई आप्पांकडे अरुंधतीसाठी मागणी घालतात. त्या आशुतोष आणि अरुंधतीचं लग्न करून देण्याबद्दल बोलतात. आप्पाही त्याला होकार देतात. मात्र हे सगळं ऐकून कांचन आजी प्रचंड संतापते. या लग्नाला विरोध करते. या वयात लग्न करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याचं म्हणते.

त्यावर आप्पा तिला शांत करत लग्नाला होकार देण्याबद्दल बोलतात. मात्र कांचन ऐकत नाही हे पाहून त्यांचा राग अनावर होतो आणि त्यांना त्रास होऊन ते खाली कोसळतात. आता अरुंधतीच्या लग्नात आणखी एक विघ्न उभं राहिलं आहे. अरुंधती आता आप्पांची तब्येत पाहून लग्नाचा निर्णय बदलणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र तसं काहीही घडणार नाहीये. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार, अरुंधती आशुतोषला लग्न करण्यावर ठाम असल्याचं सांगतेय. अरुंधतीने तिचा निर्णय बदललेला नाही. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.