व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोडशो कशासाठी? संजय राऊतांचा भाजपला सवाल
व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोडशो कशासाठी? संजय राऊतांचा भाजपला सवाल
ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपवर खा.संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना काही उद्योगपतींची भेट घेतली होती. याभेटींच्या बातम्या सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. याभेटींवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय? अशी टीका शेलार यांनी केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी आज भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ममतादीदी या काय मुंबई लुटायला किंवा ओरबडायला आल्या आहेत का? ममतादीदी मुंबई लुटायला आल्या आहेत असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्धे मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हाटब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत रोडशो घेत आहेत. व्हायब्रंट गुजरात तिकडे इकडे मुंबईत रोडशो कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असं राऊत म्हणाले.
भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी निर्माण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.