नाफेडचा कांदा बाजारात, शेतकरी हवालदिल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची भुजबळांची मागणी
नाफेडने कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणल्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेल्या नुकसानीबाबत लक्ष घालण्याची भुजबळांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
नाशिक, दि. १० सप्टेंबर :- देशात अन्य राज्यात कांद्याचे भाव वाढल्याने त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणला आहे.मात्र याचा फटका राज्यातील कांदा उत्पादकांना बसत आहे.
सध्या राज्यात कांद्याचे भाव उतरलेले असून कांद्याला सरासरी १४०० ते १५०० रु. भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने नाफेडचा कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी खाली आले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे
छगन भूजबळ यांच्या मागणीनुसार राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदय स्वत: केंद्रासोबत बोलणार असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याची माहिती भुजबळांनी माध्यमांना बोलताना दिली आहे.
ज्या शहरांमध्ये कांद्याचे दर ३० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत, त्या शहरांमध्ये ग्राहकांना कांदा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) केंद्रीय भांडार यांच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या शहरांमध्ये २४ रुपये किलो या किफायतशीर दराने कांदा विक्री सुरू केली आहे. डिसेंबरपर्यंत ही विक्री प्रक्रिया सुरू राहणार असून बाजारात आवक वाढल्यास हे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होणार असला, तरी शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार आहे. नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भेडसावणारे हे संकट दूर करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असे यावेळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.