नाशिक : सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला गुंता सुटता सुटेना. विशाल पाटील यांनी नुकताच सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून आमदार सत्यजीत तांबे यांनी विशाल पाटील यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेनेच्या (UBT) उमेदवाराला जागा दिल्यानंतर विशाल पाटील यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे आमदार सत्यजीत तांबे स्वतः देखील अशाच परिस्थितीतून गेले आहेत. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली होती.
आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक सविस्तर पोस्ट लिहून विशाल पाटील यांच्याबद्दलचं मत हे मत व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले? याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत, या मताचा मी आहे, असं देखील सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
वसंतदादा पाटलांचे आमच्यासारख्या तरुण पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजिनिअर तयार होत आहेत. विशालदादा हे वसंतदादांच्या कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं असून विशाल पाटील यांचं जाहीर समर्थन केलं आहे. विशाल पाटील यांच्या बंडाच्या निर्णयाची बाजू घेणारे तरुण नेते सत्यजीत तांबे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि हुशार नेते म्हणून ओळखले जातात.